बाहूबली २ – एक निरीक्षण

१. हे एक निरीक्षण आहे परीक्षण नाही. यात कुठेही कटप्पा ने बाहूबली का मारले याचे वर्णन नाही.
२. चित्रपटाने १००० करोड कमवल्या नंतर चित्रपटात बद्दल लिहिण्याची गरज नाही पण मी आपले निरीक्षण मांडतो.

सुंदर, अद्भुत, अकल्पनीय असा चित्रपट बनवला आहे राजमौली या दिग्दर्शकाने. चित्रपटाची प्रत्येक फ्रेमवर मेहनत जाणवते. दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेतो. महाभारताचे प्रतिबिंब जाणवेल कथेत. महाभारताच्या कथेत तुम्हाला सगळे काही सापडते त्या प्रमाणे इथे प्रयोग, प्रेमाचा त्रिकोण, हेवेदावे, मारामारी, वचन, शिक्षा, अदभुत पराक्रम विनोद, नाट्य, रहस्य, डाव-प्रतिदाव, अतर्क, अजिंक्य, डोळे दिपावणारे विशिष्ठ परिणामकारक दृश्य आणि त्यात कथेतील वळण चित्रपटाला एका वेगळ्याच रम्य दुनियेत घेऊन जातो.

प्रभास तर अमरेंद्र बाहुबली रोल करण्यासाठीच जन्माला आला आहे असेच वाटते. खूपच ताकदीने रंगवलेला बाहुबली त्याने. बाहुबलीच्या विविध छटा त्याने लीलया पार पडल्या आहेत. संयत, शांत, करारी, कल्पक,आक्रमक, हळवा, योद्धा, क्रांतिकारी बाहुबली त्याने त्याच तत्परतेने रंगवला आहे. त्याची ५ वर्षाची मेहनत चित्रपटात स्पष्ट जाणवते. प्रभास ने महेंद्र पेक्षा अमरेंद्र बाहुबली जास्त निभावला आहे. संवादफेकी वर चांगली पकड आहे. “मै यानी अमरेंद्र बाहुबली” आणि दुसरे संवाद आणि अभिनय यावर प्रभास हुकूमत गाजवतो. बाहुबली मरतो त्यावेळेस सुद्धा तलवारी वर हात ठेऊन मरतो. अफाट दृश्य आहे ते. प्रत्येक लढाईच्या वेळेस एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात छोटी कुऱ्हाड/तलवार कोठुन येते ते लक्षात येत नाही.

शिवगामी चा रोल बघताना मला महाभारता मधील सत्यवतीची आठवण येते. “मेरा वचन हि है मेरा शासन” हे वाक्य जबरदस्त ताकदीने प्रत्येक वेळेस म्हंटले आहे. विविध छटा त्याच समर्थाने रंगवलेल्या आहेत. बाहुबलीला आतून बाहेरून समजणारी आई, नाराज झालेली मग पश्याताप झालेली आणि प्राण अर्पण करणारी आई अक्षरशः जगवली आहे. चित्रपटात लढाईचे क्षण उच्चतम कोटीचे नसते तर हा चित्रपट शिवगामीच्या बहारदार अभिनया वर तरला असता .

कटप्पा काय दमदार व्यक्तिरेखा आहे. त्याने चित्रपट आपल्या बलदंड बाहूवर पेलला आहे. चित्रपटाचा आत्मा त्या भोवती फिरतो. बाहुबली आणि कटप्पा याचे नाते सहज आणि सुंदर आहे. महिष्मती साम्राज्य मध्ये फिरताना त्या दोघाच्या नात्यात काय सुंदर नात्याची सुंदर गुंफण उलगडलेली दाखवलेले आहे.

अनुष्का स्वर्गीय सोन्दर्य रूपवती जणु काही अप्सरा. फक्त लावण्यावती न दाखवता ती शूर योद्धा आणि लढाई शात्रात निपुण आहे. तिचे आणि बाहुबलीचे प्रेम बहरते. प्रेमात ते एकमेकासाठी आत्मसमर्पण सुद्धा करतात. बाहुबली प्रेमात पडल्यावर त्याच्या लढाईचे प्रसंग जबरदस्त आहेत. मंदिरात बोट छाटण्याचा प्रसंग सुद्धा जमुन आलाय आणि बाहुबली ने राज्यसभेत तलवारीने मुंडके छाटतो तो प्रसंग व्यक्तिरेखा अधोरेखित करते.

भल्लालदेव याची व्यक्तिरेखा क्रूरकर्मा आणि कठोर, खलनायकाची आहे. तो बाहुबली सोबत सतत वरचढ होण्याचा प्रयत्न करतो. त्याला बाहुबलीच्या प्रत्येक गोष्टी बद्दल तिरस्कार आहे. तो योग्य गोष्टीची वाट पाहत असतो. योग्य वेळी घाव घालतो. डावपेचावर डावपेच रचतो. स्वतःच्या आईला सुद्धा मारायला कमी करत नाही. एवढे करून सुद्धा तो बाहुबलीच्या नावाला हरवू शकत नाही. त्याने डोळ्याने केलेला अभिनय खुपच छान आहे. बिज्जलदेवचा अभिनय मस्त झालाय आणि पुरक आहे.

चित्रपटाची कथा साधीच आहे पण त्याचा परीघ आणि आखणी मोठी आहे. दोन भाऊ एकाच सिंहासना साठी लढतात नंतर एकाच राजकन्ये साठी लढतात. त्यातला एक चांगला असतो आणि दुसरा दुष्ट असतो. तो दुष्ट योजना अमलात आणतो आणि डावपेच करून बाहुबलीला मारतो. राज्य करतो आणि त्याचा मुलगा येऊन दुष्टांचा संहार करतो. पण कथेची जी उंची आहे त्या पेक्ष्या सादरीकरण परिणामकारक आणि त्यावर मेहनत जास्त घेतली आहे.

Visits: 41

Leave a Reply